ठाणे: हे सरकार मोगलांचे सरकार असल्याची टीका शिंदे सरकारवर करत, राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. याशिवाय राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दाखवत नाही असा प्रश्न देखील युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित केला. याचदरम्यान आम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केले हीच एकच टेप वाजवली जात असल्याचा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. हे सरकार अल्पावधीत कोसळणारच असा पुनरुच्चार पुन्हा एकदा त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. राजन विचारे यांच्यासह खा. अरविंद सावंत तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात एकीकडे निष्ठावान शिवसैनिकांकडून ठाण्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात तर दुसरीकडे ठाण्याच्याच एका गद्दारीने महाराष्ट्रातील उद्द्योग गुजरातला नेले असल्याचे टीका त्यांनी केली आहे.
शिवसेनेचा जन्म हा रोजगार आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी झाला आहे. मात्र हे सरकार उद्योग बाहेर पाठवण्याचे काम करत आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी हेच लोक टेबलावर नाचले होते या मानसिकतेचाही ठाकरे यांनी निषेध केला. शिवसेनेची भुमीका स्पष्ट असून हाताला काम देण्याची. रोजगाराची संधी असल्यास मराठी मुलांनी जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात काही नवीन चर्चा होत नाही केवळ एकाच कॅसेट वाजवली जात असून यामध्ये कार्यक्रम कोणताही असो त्यात आम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केले ही एकच टेप वाजवली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
शिंदे सरकारवर टीका करताना ठाकरे यांनी हे सरकार मोगलांचे सरकार असून या सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याचे सांगत या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे आवाज दाबला जात असे ही म्हटले आहे.