ठाणे : – घोडबंदर भागातील मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील रहिवाशांचा क्लस्टरला विरोध असतांनाही महापालिकेकडून येथे क्लस्टर राबविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या विरोधात येथील नागरीक रस्त्यावर उतरले होते. परंतु त्यांना न्याय अद्यापही न मिळाल्याने ग्रामसुधार समितीच्या वतीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
समितीने घराखालील जागेच्या मालकी हक्क मंजुर करुन त्याचा ताबा द्यावा, बिल्डर धार्जिणी धोरण बदलून मानवतेचा विचार करुन गरीब घरमालकांना त्याचा कायदेशीर हक्क मिळावा, सर्वांंगिण विकासासाठी पावले उचलावीत, शहरातील सर्व झोपडपट्टी किंवा बेकायदेशीर घरामध्ये राहणाऱ्या नागरीकांना टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून इमारतीच्या आराखडे, रस्ते, शाळा, गार्डन याचे मार्कींग करुन जेथे रहिवाशी राहतात त्यांच्या प्रत्येक कुटुंबास बँकेचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे, ५०० चौ. फुटांचे घर त्यांनी स्वत: बिल्डर ठरवून बांधकाम केल्यास त्यांना योग्य न्याय मिळेल त्या दृष्टीने विचार व्हावा अशा काही प्रमुख मागण्या येत्या २५ तारखेला हा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात केल्या आहेत.