Homeठाणे-मेट्रोघोडबंदर रोडवासीय तिहेरी कोंडीने त्रस्त; मनोहर डुंबरेंकडून आयुक्तांना साकडे

घोडबंदर रोडवासीय तिहेरी कोंडीने त्रस्त; मनोहर डुंबरेंकडून आयुक्तांना साकडे

कायमस्वरुपी दिलासा देण्याची मागणी

ठाणे : – रहिवाशी सोसायट्या व रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, दररोजची तीव्र पाणीटंचाई आणि कापूरबावडीपासूनच्या नित्य वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रोडवासियांची तिहेरी कोंडी होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांवर कायमस्वरुपी दिलासा देण्याच्या मागणीसाठी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. त्यावेळी येत्या दोन दिवसांत घोडबंदर रोडवर साचलेला कचरा उचलण्याचे व इतर प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

घोडबंदर रोडवरील रहिवाशी सोसायट्या व आस्थापनांच्या माध्यमातून महापालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर उपलब्ध होतो. तर बिल्डरांकडून दाखल केल्या जाणाऱ्या विकास प्रस्तावांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे महापालिकेची तिजोरी मोठ्या प्रमाणावर भरली जाते. मात्र, महापालिकेला महसूल देणाऱ्या घोडबंदर रोडवासीय प्रामाणिक करदात्यांवर सातत्याने अन्याय होत आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले.
सद्यस्थितीत घोडबंदर रोडवरील नागरिकांना ठिकठिकाणी साचलेला कचरा, तीव्र पाणीटंचाई आणि वाहतूककोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या तिहेरी कोंडीमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. गेल्या आठवडाभरापासून या भागातील विविध सोसायट्यांच्या बाहेर व वर्दळीच्या रस्त्यांलगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यापूर्वी दिवाळीआधीही कचरा उचलला गेला नव्हता. त्यामुळे दर सहा महिन्याने उद्भवणाऱ्या घनकचऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांकडून आग्रही मागणी करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर रोडवासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर आदींच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. दरवेळी गोड बोलून आश्वासने देऊन कागदी घोडे नाचविले जातात. एका बैठकीत ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता घोडबंदरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याचे बिल म्हणून दरमहा चार ते पाच हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे, याकडे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
मुंबईहून ये-जा करताना घोडबंदर रोडवासियांना दररोज किमान दोन तास वाहतूककोंडीत अडकावे लागते. या परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम वेगाने करण्याबाबत महापालिकेने पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

error: Content is protected !!