29 अनधिकृत नळजोडण्या खंडित; संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ठाणे : मुंब्रा व दिवा विभागातील पाणीटंचाई आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत अनधिकृत नळजोडण्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कल्याण फाटा ते वाय जंक्शन तसेच मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार दि. 11 सप्टेंबर 2026 पासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत दि. 16 सप्टेंबर रोजी एकूण 29 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
या कारवाईत दिवा विभागातील भोलेनाथ नगर नाला येथील 13, गुलिस्तान हॉटेल नाला येथील 6 आणि शिळगाव मंदिर परिसरातील 1, तर मुंब्रा विभागातील मित्तल ग्राउंड नाला येथील 7 आणि ग्लोबल नाला येथील 2 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान कल्याण फाटा ते वाय जंक्शनपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारवाईच्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या मोहिमेत उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंते शशिकांत साळुंके व अतुल कुलकर्णी, उपअभियंते सुरेश वाघेरे व गुणवंत पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंते व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यापूर्वीही दि. 8 सप्टेंबर रोजी 16 आणि दि. 11 सप्टेंबर रोजी 15 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, ही कारवाई दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
अनधिकृत जोडण्या पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना
एकदा खंडित केलेल्या अनधिकृत नळजोडण्या पुन्हा जोडल्या जाऊ नयेत यासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वारंवार अनधिकृत जोडण्या होत असलेल्या ठिकाणी 24 तास क्लॉकमन तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत नियमित गस्त (Patrolling) घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंब्रा व दिवा परिसरातील नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, तसेच जलवाहिन्यांमधील अनधिकृत पाणीउपसा रोखला जावा, यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.






