व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांच्या आवाहनाला दिव्यातील दुकानदार व व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
दिवा:-काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिवा शहरातील दिवा मर्चंट व्यापारी संस्थेमार्फत दिवा शहर बंदची हाक देण्यात आली होती.व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सौ ज्योती राजकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर दिवा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दहशतवाद्यांचा निषेध केला. दिवा शहरातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. त्याचबरोबर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व्यापारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
कश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले होते.यानंतर देशभरात या दहशतवादी कृत्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी दिवा शहरात व्यापारी संस्थेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.व्यापारी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी दिवा शहरातील सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला दिवा शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवा शहरात कडकडीत बंद पाळत दहशतवादी कृत्याचा निषेध केला. त्याचबरोबर हा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचा व दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची मागणी यावेळी दिवा शहरातील व्यापारी व दुकानदारांनी केली.