ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध निवड झाली असून मुंब्रा प्रभागसमिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिपाली भगत विजयी झाल्या.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मिनल मुकुंद संख्ये, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री जेरी डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण शंकर पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया मनोज लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक नामदेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मात्र चुरशीची लढत झाली. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अन्सारी नफीस अहमद मोहम्मद अनीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या दिपाली मोतीराम भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात अन्सारी यांना 4 मते, तर दिपाली भगत यांना 10 मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिपाली भगत यांना विजयी घोषित केले.






